drmukteshdaund

atmahatyeche-vichar

आत्महत्येचे विचार म्हणजे काय? — समजून घेऊ

आत्महत्येचे विचार म्हणजे काय? — समजून घेऊ

आत्ता त्रास होत असेल तर वाट बघू नका

टेली-मानस — १४४१६   ·   तातडीचा धोका असेल तर — ११२

मोफत. २४ तास. मराठीत बोलता येतं.     

मदतीचे पान वाचा

थोडक्यात

असे विचार येणं म्हणजे तुम्ही ठरवलंय असा अर्थ नाही. तो बहुतेकदा एका आजाराचा किंवा तीव्र मानसिक अवस्थेचा भाग असतो.

आणि ती अवस्था कायम राहणारी नसते. ती बदलते, आणि उपचारांनी लवकर बदलते.

हे पान समजून घेण्यासाठी आहे. आत्ता त्रास होत असेल तर वरचा नंबर आधी वापरा — समजून घेणं नंतरही होईल.

हे विचार म्हणजे निर्णय नाही

बरेच जण या विचारांना घाबरतात, कारण त्यांना वाटतं की विचार आला म्हणजे आपण त्या दिशेने चाललोय.

तसं नाही.

हे विचार बहुतेकदा दुसऱ्या कशाचं तरी लक्षण असतात — नैराश्य, दीर्घकाळचा ताण, व्यसन, कधी शारीरिक आजार. ताप हा जसा संसर्गाचं लक्षण असतो, तसं.

आणि लक्षणावर उपचार होतात.

म्हणजे प्रश्न “मी असा विचार का करतोय” हा नाही. प्रश्न “माझ्या मनाची अशी अवस्था का झालीये, आणि ती कशी बदलेल” हा आहे.

"मला मरायचं नाही, पण जगावंसंही वाटत नाही"

हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण इथेच बहुतेक जण गप्प बसतात.

बऱ्याच जणांच्या मनात असं येतं —

  • “सकाळी उठूच नये असं वाटतं”
  • “मी नसतो तर बरं झालं असतं”
  • “कशाला हे सगळं”
  • “काहीतरी होऊन संपलं तर सुटका होईल”

यात ठरवलेलं काही नसतं. योजना नसते. आणि म्हणूनच लोक याला “एवढं काही गंभीर नाही” म्हणून बाजूला ठेवतात.

पण हेसुद्धा सांगण्यासारखं आहे.

कारण अशा विचारांचा अर्थ एवढाच की मनावरचा भार सहन होण्यापलीकडे गेलाय. आणि तेवढं कळणं पुरेसं आहे — मदत मागण्यासाठी परिस्थिती अजून वाईट होण्याची वाट बघावी लागत नाही.

डॉक्टरकडे जाण्यासाठी किमान गुण मिळवावे लागत नाहीत. हे पुन्हा सांगतो, कारण बहुतेक उशीर याच एका समजुतीमुळे होतो.

विचार येतो, पण करावंसं मुळीच वाटत नाही

हा एक वेगळा प्रकार आहे आणि तो फार कमी वेळा समजावून सांगितला जातो.

काही जणांच्या मनात असे विचार अचानक, नकोसे असताना येतात. आणि ते आल्यावर त्यांना प्रचंड भीती वाटते.

“असा विचार आलाच कसा? मी वाईट माणूस आहे का? मी काहीतरी करून बसेन का?”

इथे एक फरक लक्षात घ्या. ज्या विचारांची तुम्हाला भीती वाटते, जे तुम्हाला नकोसे वाटतात, आणि ज्यांच्यापासून तुम्ही दूर पळताय — ते विचार आणि इच्छा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

बाळंतपणानंतर, तीव्र चिंतेत, आणि काही वेळा वारंवारच्या विचारांच्या आजारात असं होतं. त्रास खरा असतो, पण त्याचा अर्थ तुम्ही धोकादायक आहात असा नाही.

आणि यावर उपचार आहेत — नेमके, आणि परिणामकारक.

म्हणून हे लपवू नका. “असं सांगितलं तर लोक काय समजतील” या भीतीने बरेच जण वर्षानुवर्षं हे एकटेच वाहतात.

बोगद्यासारखं होतं

या अवस्थेत मनाला एक विशिष्ट गोष्ट होते, आणि ती समजून घेतली तर बरंच स्पष्ट होतं.

विचार अरुंद होतात. बोगद्यात शिरल्यासारखे.

त्या क्षणी दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. आधी जे पर्याय होते ते आठवत नाहीत. आणि हे कायम असंच राहणार असं ठाम वाटतं.

पण हा बोगदा अवस्थेमुळे तयार झालेला असतो, परिस्थितीमुळे नाही.

झोप सुधारली, उपचार सुरू झाले, किंवा नुसते काही दिवस गेले — तरी तेच प्रश्न वेगळे दिसायला लागतात. हे मी रुग्णांकडून वारंवार ऐकलंय: “तेव्हा मला दुसरं काहीच सुचत नव्हतं.”

म्हणून एकच गोष्ट: अशा अवस्थेत मोठे निर्णय घ्यायचे नसतात. ती अवस्था बदलेपर्यंत थांबायचं असतं.

डॉक्टरांना कसं सांगायचं

बरेच जण ठरवून जातात आणि खोलीत गेल्यावर शब्दच फुटत नाहीत. म्हणून काही वाक्यं देतो — यातलं कुठलंही पुरेसं आहे.

“डॉक्टर, मला काहीतरी सांगायचंय पण सांगायला अवघड जातंय.”

“कधीकधी मला वाटतं की सकाळी उठूच नये.”

“मनात नकोसे विचार येतात आणि मला त्यांची भीती वाटते.”

एवढं पुरतं. पुढचं विचारणं त्यांचं काम आहे.

आणि हे लिहून नेलं तरी चालतं. कागदावर लिहून पुढे करणं ही अनेकांसाठी सगळ्यात सोपी पद्धत ठरते.

एक गोष्ट लक्षात ठेवा — डॉक्टर हा प्रश्न सगळ्यांना विचारतात. तो तपासणीचा नेहमीचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही सांगितलंत तर ते दचकणार नाहीत.

"सांगितलं तर भरती करतील का?"

ही भीती जवळपास प्रत्येकाच्या मनात असते, आणि तीच सगळ्यात जास्त लोकांना गप्प ठेवते.

प्रामाणिक उत्तर: बहुतेकदा नाही.

असे विचार सांगणारे बहुसंख्य लोक बाहेरून उपचार घेतात. औषधं, बोलणं, पाठपुरावा — आणि घरीच राहून.

दाखल होणं सुचवलं जातं जेव्हा धोका प्रत्यक्ष आणि तातडीचा असतो, किंवा घरी सांभाळणं शक्य नसतं. आणि तसं असेल तर ते तुमच्याशी बोलून ठरतं.

आणि आणखी दोन गोष्टी माहीत असू द्या —

  • तुम्ही सांगितलेलं गोपनीय असतं. घरच्यांना, ऑफिसला किंवा नातेवाइकांना ते आपोआप कळत नाही.
  • आत्महत्येचा प्रयत्न हा आता गुन्हा नाही. कायद्याने अशी व्यक्ती तीव्र तणावाखाली होती असं गृहीत धरलं जातं, आणि तिच्यावर खटला भरला जात नाही.

रुग्णाच्या हक्कांविषयी सविस्तर स्वतंत्र लेख दिलेला आहे

उपचारांनी नेमकं काय होतं

  • इथे एक गैरसमज दूर करू. उपचार म्हणजे कुणीतरी तुम्हाला समजावून सांगणं नाही.

    जे केलं जातं ते असं —

    • हे विचार कशामुळे येतायत ते शोधलं जातं — नैराश्य, चिंता, व्यसन, झोपेचा त्रास, कधी शारीरिक कारण
    • त्या मूळ कारणावर उपचार होतात. ते सुधारलं की विचारांची तीव्रताही कमी होते.
    • बोलण्याच्या उपचारांत ती बोगद्यासारखी अवस्था ओळखायला आणि हाताळायला शिकवलं जातं
    • जवळचे दिवस सुरक्षित कसे काढायचे याचं नियोजन केलं जातं
    • आणि घरातल्यांना काय करावं हे सांगितलं जातं

    वेळ लागतो. दोन दिवसांत नाही. पण झोप, भूक आणि सकाळचा त्रास — हे बऱ्याचदा आधी सुधारतात, आणि तेवढं सुधारलं की पुढचं सोपं होतं.

घरातल्यांसाठी

कुणी असं काही बोललं तर घाबरून जाऊ नका, आणि विषय बदलू नका.

थेट विचारा, शांतपणे. मध्ये न बोलता ऐका. आणि एकटं सोडू नका.

काय करावं आणि काय टाळावं याविषयी सविस्तर मदतीच्या पानावर दिलेलं आहे — ते जरूर वाचा.

इथे एकच गोष्ट सांगतो, कारण ती वारंवार चुकते: “एवढं काय झालं, तुझ्याकडे तर सगळं आहे” — असं म्हणू नका. हेतू चांगला असतो, पण त्यातून माणूस बोलणं बंद करतो. आणि एकदा बंद केलं की पुन्हा सुरू करणं फार अवघड जातं.

ज्यांनी कुणाला गमावलं आहे त्यांच्यासाठी

हा भाग वेगळा आहे, आणि तो लिहायला हवा असं मला वाटतं — कारण या माणसांना कुणी विचारत नाही.

अशा नुकसानीनंतर जे वाटतं ते इतर दुःखांपेक्षा वेगळं असतं. त्यात दुःखाबरोबर अपराधीपणा येतो, आणि “मला कसं कळलं नाही” हा प्रश्न वर्षानुवर्षं राहतो.

एक गोष्ट सांगतो, आणि ती खरी आहे.

अशा वेळी माणूस जे करतो ते एका आजारलेल्या मनाच्या अवस्थेतून येतं. ती अवस्था बाहेरून दिसतेच असं नाही — कारण बरेच जण ती लपवतात, आणि काही जण शेवटच्या दिवसांत उलट शांत दिसतात.

तुम्ही जे बघितलं नाही ते बहुतेकदा दाखवलंच गेलं नव्हतं. हा तुमचा दोष नाही.

आणि जर हे दुःख वर्षानुवर्षं तसंच राहिलं असेल, झोप-काम-नाती बिघडली असतील, तर त्यावरही मदत घेता येते. यात कमीपणा नाही.

एक प्रसंग

(हा अनेक अनुभवांवरून तयार केलेला काल्पनिक प्रसंग आहे. कुठल्याही एका व्यक्तीचा नाही.)

तिशीतले एक गृहस्थ. दवाखान्यात आले ते झोपेच्या तक्रारीसाठी. सहा महिन्यांपासून झोप नव्हती.

बोलणं झोपेवरच चाललं होतं. मग नेहमीचे प्रश्न विचारताना विचारलं — कधी असं वाटतं का की जगावंसं वाटत नाही.

ते थांबले. बराच वेळ.

मग म्हणाले, “तसं काही ठरवलेलं नाही हो. पण सकाळी उठूच नये असं वाटतं. रोज.”

मग विचारलं की हे किती दिवसांपासून.

“वर्षभर.”

त्यांनी हे कुणालाच सांगितलं नव्हतं. कारण त्यांना वाटलं होतं की एवढं गंभीर काही नाही — “मी काही करणार नाहीये, मग सांगायचं काय?”

उपचार सुरू झाले. आधी झोप सुधारली. मग बाकीचं.

काही महिन्यांनी ते म्हणाले — “मी वर्षभर हे एकटा वागवत होतो. आणि सांगितलं नाही याचं कारण एवढंच होतं की मला वाटत होतं ते सांगण्याइतकं मोठं नाहीये.”

प्रश्न आणि उत्तरं

असे विचार येणं म्हणजे मी कमकुवत आहे का?

नाही. हे मनाच्या ताकदीचं मोजमाप नाही. हे आजाराचं किंवा तीव्र अवस्थेचं लक्षण आहे, आणि ते कुणालाही येऊ शकतं.

हे विचार कायमचे राहतात का?

नाही. ही एक अवस्था असते आणि ती बदलते. उपचारांनी ती लवकर बदलते.

सांगितलं तर घरच्यांना कळेल का?

तुमच्या परवानगीशिवाय नाही. गोपनीयता हा तुमचा हक्क आहे. काही परिस्थितींत — जिथे जीवाला थेट धोका असतो — त्याला मर्यादा येतात, आणि तसं असेल तर ते तुम्हाला सांगून केलं जातं.

औषधं घ्यावीच लागतील का?

नेहमी नाही. ते मूळ कारण काय आहे यावर ठरतं. काही जणांना बोलण्याच्या उपचारांनी फरक पडतो, काहींना दोन्ही लागतात.

घरातल्या कुणाला विचारलं तर त्याच्या डोक्यात कल्पना जाईल का?

जात नाही. उलट, कुणीतरी नाव घेऊन विचारलं की बहुतेकांना हलकं वाटतं. विचारा, आणि ऐका.

आधार

  • जागतिक आरोग्य संघटना (WHO) — आत्महत्या प्रतिबंधाविषयी मार्गदर्शक सूचना
  • मानसिक आरोग्य सेवा कायदा, २०१७ — कलम ११५
  • टेली-मानस — राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार

सूचना

हे पान माहितीसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही आणि प्रत्यक्ष तपासणीची जागा तो घेऊ शकत नाही. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला त्रास होत असेल तर पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तातडीच्या परिस्थितीत १४४१६ किंवा ११२ वर फोन करा.

Scroll to Top